Saturday, March 18, 2006

हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

दूरचित्रवाणीवर वाहीन्यांचा सुळसुळाट होण्यापूर्वी दूरदर्शनवर काही चांगले कार्यक्रम लागायचे. 'महाश्वेता' ही अशीच एक वाट बघायला लावणारी मालीका. मनाला हुरहुर लावणा~या कथानकावर आधारीत ही मालिका कदाचित काही दिवसांनी स्मृतीपटलावर पुसटशी होईल.
पण त्यातल्या दोन गोष्टी मात्र कायम स्मरणात राहतील. एक म्हणजे ऎश्वर्या नारकर. (इथे अपरीहार्य आठवण झाली जी सांगीतल्या खेरीज पुढे जाणे शक्य नाही ती म्हणजे 'श्रीकांत' मधली मृणाल देव)
आणि दुसरे म्हणजे त्याचे शीर्षक गीत.
कवी ग्रेस यांची ही कविता. ह्रदयनाथ मंगेशकरांची चाल. आणि दुधात साखर म्हणजे लताबाईंचा आवाज. या तिनही गोष्टी इतक्या छान जमून आल्या आहेत की काय विचारता. अप्रतिम! अप्रतिम! अप्रतिम! अप्रतिम!"

झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया" या ओळींशी मी पुन्हा पुन्हा थबकतो. ते उगवणं मनातल्या मनात अनुभवत त्या झाडाखालचा विसावा या ओळींमधे शोधत राहतो.

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गाते
तू मला शिकवीली गीते

हे झरे चंद्र सजणांचे
ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल
जणु अंगी राघव शेला

स्तोत्रात इन्द्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे
- ग्रेस


जेव्हा जेव्हा एकटा असतो मुक्यानेच ही कविता आतल्या आत पित असतो, चवीचवीने. आणि या शेवटच्या ओळीमधे मीच कधीसा विरघळून जातो माझे मलाच कळत नाही.
स्तोत्रात इन्द्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

4 comments:

Nandan said...

100% sahmat

hemant_surat said...

अरे राजा,
कोठून एवढ्या छानछान कविता आणतोस? फ़ार अस्वस्थ करून सोडतोस. पण खरं सांगू? हे अस्वस्थ होणंच हवंय. हे अस्वस्थ होणंच दूर कुठेतरी पळून गेलं होतं ते परत आलंय. तू ते खेचून परत आणलंय ह्याबद्दल मनापासून धन्यवाद! लिहीत रहा, आणत रहा, फ़ोटोमधून खुणवत रहा, आम्ही थकणार नाही प्रतिसाद द्यायला.
हेमंत पाटील

Gayatri said...

ऐश्वर्या नारकर आणि मृणाल देव..भा.पो., आणि ठाम रुकार! :)
त्या शीर्षक गीतात 'तो बोल..' कडवं पण असायला हवं होतं असं राहून राहून वाटायचं. 'हे सरता संपत नाही' मधल्या शेवटच्या शब्दावर काय गिरकी घेतली आहे लतादिदींनी!!!
ग्रेसबद्दलच्या कुठल्याशा लेखात ही गाणं त्यांनी त्यांच्या आईला उद्देशून लिहायला सुरुवात केली होती असं म्हटलंय..'मी संध्याकाळी गातो - ' हे त्यातून आलं म्हणे.

Sharad said...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

yacha artha mala neet lagla nahi, krupaya to sangava hi vinanti