Monday, March 23, 2009

मला भेटलेला कार्व्हर

दोन दिवसांपूर्वी आमच्या इथे एक व्याख्यान झाले. विषय, वक्ता, भाषण तिन्ही गोष्टी प्रभावी होत्या. काही "साधीसुधी" असामान्य माणस सहजपणे भेटतात तसा काहीसा अनुभव होता.
त्या व्यक्तीची अधिक माहिती इंटरनेट वर मिळेलच. http://en.wikipedia.org/wiki/John_Francis_(environmentalist)
त्याचं काहीसं भाषणही उपलब्ध आहेच.
http://www.youtube.com/watch?v=NlYJQ0psZYA
त्यामुळे जास्त तपशिलात न शिरता. जसं ते माझ्यापर्यंत पोचलं तसं ते इतरांपर्यंत पोचविण्याचा हा क्षीण प्रयत्न.
****************
मला भेटलेला कार्व्हर

वीणा गवाणकरांच्या "एक होता कार्व्हर" मधला कार्व्हर आज भेटला. कुठलेही पुस्तक, मग ते काल्पनिक असो अथवा चरित्रात्मक, त्यातील कथाव्यक्तींना (हिंदीमधे किती छान शब्द आहे- किरदार. मराठीतपात्रम्हणताना ती मजा येत नाही) एकेक चेहरा आपसूकच बहाल केला जातो. आपल्या आठवणीतले चेहरे, कधी ओळखीचे चेहरे एखाद्या गोष्टीत अगदी चपखल बसतात.पण कधी असं होतं की एखादी गोष्ट चेहर्‍याविना तशीच राहिलेली असते. एखाद दिवशी कोणीतरी भेटतं आणि त्या गोष्टीतला चेहरा आपल्याला मिळतो. तस्सचं आज त्याला पाहिलं
आणि मला माझा कार्व्हर मिळाला. तो कदाचित बहुपैलू शास्त्रज्ञ नसेलही पण आपला बहुताल बदलण्यासाठी कुठलाही गाजावाजा करता एका विशिष्ट ध्येयानी प्रेरित होऊन आपले काम करत राहण्यातली सहजता मात्र तीच.

हातात घेतलेलं बॅंजो वाजवत वाजवत तो व्यासपीठाच्या तीन पायर्‍या चढला तेव्हाच त्यानी ते जिंकलेलं होतं. त्या कलंदर वाद्याच्या तारांवर काही मुक्तछंद सुरावटी अगदी सहजतेनं छेडून त्याने ते बाजूला खुर्चीवर ठेवून दिलं.
मग एक दिलखुलास स्मितहास्य....
त्या अनवट सुरांनी सभागृहभर ओसंडू पहाणारं चैतन्य त्या प्रेमळ स्मितहास्यानं सैलावलं आणि आरामखुर्चीत विसावल्यासारखं ज्या त्या खुर्चीत स्थिरावलं. काही काळ तिथे शब्दांना जाग नव्हती. नंतर तो बोलला. ते वाक्य जे तो सतरा वर्षाच्या मौनानंतर बोलला होता.
"धन्यवाद! आपण इथे आलात त्याबद्दल."
आज तो माझ्यासारख्या दोनशे लोकांनी भरलेल्या सभागृहासमोर बोलत होता. गांधीजयंती (ची सुट्टी) साजरी करणार्‍या, त्या दिवसाची खरेदी तरी श्रद्धेनी एमजी रोड वरच करणार्‍या, थेटरात जाऊन आदराने मुन्नाभाई पाहणार्‍या, ड्राय डे च्या त्यागावर गांधींच्या पुतळ्याला हार चढवणार्‍या लोकांसमोर तो बोलत होता. तो मात्र भारावला होता कारण तो मौन आणि पदयात्रा यांच्या जोरावर सत्याचा आग्रह धरणार्‍या गांधींच्या देशात बोलत होता.

पण जेव्हा अठरा वर्षांपूर्वी त्यानी मौन सोडलं तेव्हा त्याच्या समोर त्याची म्हातारी आई, वडील आणि काही जवळचे नातेवाईक होते. तो बोलला तेव्हा आपलं नुकतं रांगायला लागलेलं मूल प्रथमच बोलायचा प्रयत्न करतं तेव्हा त्याच्या आईची जी स्थिती होते तशीच काहीशी प्रतिक्रिया त्याच्या माऊलीची झाली. ती गहिवरून एकदम ओरडली- अहो बघा, बघा जॉन बोलतोय!
जॉन तर एक संपूर्ण वाक्य एका दमात म्हणाला होता.
"धन्यवाद! आपण इथे आलात त्याबद्दल."
त्यानी मागे वळून बघितलं. त्याला क्षणभर कळलंच नाही की हा आवाज कोणाचा. मग आपलाच आवाज ओळखून त्याचं त्यालाच हसू आलं. त्याला हसताना बघून वडील म्हणाले, "तरी मी म्हणलं नव्हतं याचं डोकं अजून ताळ्यावर नाहीये म्हणून" तरी ते खूपच खूश होते. जॉननी त्यांची दोनापैकी एक तरी इच्छा पूर्ण केली होती. जॉननी जे दोन निश्चय केले होते ते त्यानी सोडावेत याच दोन इच्छा त्याच्या वडिलांनी धरलेल्या होत्या. त्या दोनीही जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जॉन काही कामाचा नाही ही त्यांची पक्की खात्री होती. तो आज सतरा वर्षांनी बोलत होता पण अजूनही शारीरिक श्रमाखेरीज इतर कुठल्याही इंधनावर चालणार्‍या गाडीत बसायला तो तयार नव्हता.

भारताची औद्योगिक राजधानी म्हणवणार्‍या एका अवाढव्य शहरात, संध्याकाळची वेळ, मोटारींचा प्रचंड लोंढा अतिशय संथ गतीने रस्त्यावरून वहात होता. प्रत्येक गाडी आपल्या भोवती एक धूम्रवलय विणत होती. शहरातील प्रदूषण संवर्धनाच्या उदात्त कार्यात आपापला हातभार लावत होती. त्यातच एका गाडीत खिडकीतून त्या धुराकडे एकटक बघत जॉन शांतपणे बसला होता. अशाच मोटारीतून हिंडणार्‍या लोकांसमोर आज त्याला बोलायचं होतं.
बावीस वर्ष जे तो अमेरीकेत पायी फिरला त्या बद्दल बोलायचं होतं. खर तर उशीरच झाला होता पण आज तो गाडीत होता. धुराचा एक गुदमरून टाकणारा वास सगळीकडे पसरला होता.

सॅन फ्रॅन्सिस्कोच्या गोल्डन ब्रिजजवळ दोन तेलवाहू जहाजांची धडक झाली होती.(१९ जानेवारी, १९७१) त्यात लागलेल्या आगीत ते तेल बराच वेळ जळत होतं. त्याचा धूर आकाशभर झाला होता. जॉन गाडीत बसला होता, शेजारी त्याची मैत्रीण. दोघं जवळच्याच एका गावातले. नक्की काय झालंय बघायला निघालेले. बराच खटाटोप करून शेवटी ते अस्वस्थ करणारं दृश्य त्यांना बघायला मिळालं.धुराचा एक गुदमरून टाकणारा वास सगळीकडे पसरला होता आणि पाण्यात दूरपर्यंत पसरलेला तो तेलाचा काळा तवंग. काठाला पक्षांची आणि माशांची गोठलेली प्रेतं. परतताना तो तिला म्हणाला,
"आपण काहीतरी करायला पाहिजे."

"काहीतरी म्हणजे काय?"
"काहीतरी म्हणजे..... उदाहरणार्थ गाडी सोडून देऊन पायी फिरणे"
"हे बघ जॉन, जर एखादा श्रीमंत माणूस पायी चालायला लागला तर लोक म्हणतील त्याचा नक्कीच उदात्त हेतू असणार. पण तुझ्या माझ्या सारखे लोक तसे करतील तर आपल्या दरिद्रीपणाची फक्त कीवच केली जाईल."
ती म्हणाली ते अगदीच खरं होतं. तो फक्त एक हिप्पी होता. एक काळा हिप्पी.

होणार्‍या उशिरामुळे इकडे संयोजकांनी समयसूचकतेने चहाची व्यवस्था केली. चहाच्या निमंत्रणाबरोबरच कार्यक्रमाला थोडा उशीर होईल अशी घोषणा करण्यात आली. वाहतुकीची कोंडी हे कारण सगळ्यांनी न सांगताच ओळखलेलं होतं. चहाच्या घोटाघोटाला मुंबईतील रहदारी यावरील चर्चेलाही रंग चढत होता. चहाच्या प्रत्येक कपाचं प्लॅस्टीक तापलं होतं. कपातल्या कपात कर्कश्य चरचरत होतं. काहींचे चहा संपले तर काहींच्या चर्चा आणि मग कपांचा कचरा झाला. कदाचित प्रत्येक कप रीसायकल होणार होता... परत परत. आणि परत परत. एका स्वरूपातून दुसर्‍या स्वरूपात... भौतिकशास्त्रातल्या ऊर्जेसारखा. अखेरीस अमरत्वाचा शाप भोगत... कोडग्यासारखं... इकडे तिकडे... असून नसल्यासारखं! हे थांबायचं कधी?
गर्दीतला एक जण, ज्याला चहानंतर सिगरेट लागते, नाकातून गंभीरपणे धूर सोडत म्हणाला, "कोणीतरी सुरूवात करायलाच लागते"

"सुरवात तर करायलाच हवी" जॉननी स्वतःशीच ठरवलं आणि तो घरातून बाहेर पडला. तेव्हा तो सव्वीस वर्षाचा होता. बायकोनी त्याला सांगितले की तिला काही असले जमायचे नाही. तो एकटाच निघाला. पुरेसं शिक्षण नाही, पैसा नाही, प्रतिष्ठा नाही, काळेपणाच्या खोलवर रूतलेल्या धडधडीत सत्याखेरीज कुठलेही अस्तित्व नाही.
करायचे
काय?
कुणी गमतीत म्हणले, " जॉन, तुला काहीतरी करायचंय ना? मग पूर्वेकडे तोंड कर आणि चालायला लाग. आणि हो, थोबाड बंद ठेवायला विसरू नकोस."
पाठीवर संसार बाधून जॉन खरंच निघाला. वाटेतून त्याने आईवडिलांना फोन केला आणि त्याच्या पदयात्रेची कल्पना दिली. पर्यावरण हा शब्दही ऐकलेल्या आपल्या आईवडिलांना समाधानकारक असं कारण मात्र त्याला देता येईना.
यावर तो फक्त म्हणाला, "आई, मी आनंदात आहे"

परिणाम इतकाच झाला की आया जसं काहीतरी नेहमी आईछाप बोलतात तसं त्याची आई म्हणाली,
"तू खरचं आनंदात असतास तर तसं म्हणाला नसतास"
आणि
वडील बरच काही शहाणपणाचं बोलले जे चालण्याचं वेड घेतलेल्या जॉनच्या काहीच कामाचं नव्हतं. मात्र त्यानी एक ठरवलं- आधी आपलं शिक्षण पूर्ण करायचं.
तो चालत चालत एका शाळेत येऊन पोचला.

जॉन पोचला तसे सभागृहाबाहेर रेंगाळणारे लोकही आत येऊन बसले. सभागृह अगदी तुडुंब भरून गेलं होतं. जॉनचा परिचय म्हणून एक छोटीशी चित्रफीत दाखवण्यात आली. ज्यात परिचयापेक्षा जाहिरातच अधिक होती. पण त्यामुळे उत्सुकता अजूनच वाढली. कौशल्याने विणलेल्या साडीतील एक विदुषी जॉनच्या स्वागतपर बरच काही बोलली.

बोलण्यातच आपला बराचसा वेळ जातोय हे लवकरच त्याच्या लक्षात आलं. आपल्या चालण्याचं समर्थन करण्यातच तो दमून जाई. म्हणून एका वाढदिवसाला त्यानी ठरवलं की आजच्या दिवस तरी मौन पाळायचं. त्या दिवशी त्याला कळलं की आज पर्यंत आपण कधी नीट ऐकतच नव्हतो. समोरचा बोलायच्या आधीच आपण वाक्याची जुळवाजुळव करायला लागतो केवळ हे दाखवण्यासाठी की आपण समोरच्यापेक्षा किती हुशार आहोत. मग तो एका दिवसाचा निश्चय पुढे सतरा वर्षे टिकला. जसे त्यानी ठरवले की आता आपण बोलायचे नाही. त्यानी आईला तशी चिठ्ठी लिहीली. उलट तार आली की तुझे वडील तुझ्याकडे यायला विमानात बसले आहेत. अर्थात कोणाच्या समजावण्याचा काही परिणाम झाला नाही आणि जॉन ने आपला हट्ट कायम ठेवला. तो वडिलांना म्हणाला मी चालत तुम्हाला भेटायला येतो. याला रस्त्यातच काहीतरी होणार आणि आपला मुलगा आता काही आपल्याला परत दिसणार नाही म्हणून आईने गळा काढला.
वडील
म्हणाले, "इकडे यायच्या फंदात पडू नकोस. आम्हाला इथे लोक ओळखतात. इथे तुझे असले चाळे चालायचे नाहीत"
तोपर्यंत त्याचं शालेय शिक्षण पूर्ण झालेलं होतं. दक्षिण ओरेगॉन विश्वविद्यालयातून त्याने पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अर्थात हे सगळे मौन पाळून. आता त्याला वेध लागले होते उच्चशिक्षणाचे.
तो लवकरच मजल दरमजल करत वॉशिंग्टनला पोचला. तिथे राहून पुढच्या समुद्रप्रवासासाठी त्याने स्वतः एक नाव तयार केली. हे काम करता करता मोंटाना विश्वविद्यालयात पर्यावरण विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मी येऊ इच्छितो असे पत्र त्याने संबंधित अधिकार्‍यांना धाडले होते. त्यावर त्यांचे प्रोत्साहन देणारे उत्तरही आले. त्यात त्यांनी विचारले की या अभ्यासक्रमासाठी कधीपर्यंत यायचा त्याचा मानस आहे. यावर त्याने कळवलं,
"उद्या इथून निघत आहे. बोट वल्हवत आणि चालत तिथे पोचायला साधारण दोन वर्ष लागतील."
आणि मग त्याची सुरस चमत्कारिक सफर चालू झाली.

"तुमच्या प्रवासात तुम्हाला कधी वाईट अनुभव नाही का आले?" एका चुणचुणीत मुलाने जॉनला विचारले. सतरा वर्षे मौनांची खुणांमधे जी भाषांतरे करण्याची त्याला सवय लागली होती. ती अजूनही तशीच होती. जरी आता तो बोलत असला तरी सोबत त्याचे हातवारे चालूच होते. नुसतेच हातवारे नाहीत तर सर्वांगाने त्याचा अभिनय चालू होता.
"वाईट अनुभवही आले. कदाचित संख्येने जास्त वाईट अनुभव आले. पण जे चांगले अनुभव आले ते हिमालयाएवढे (आल्प्सएवढे) भव्य होते त्यापुढे वाईट अनुभव फारच खुजे वाटतात. त्यामुळे मागे वळून
बघताना फक्त चांगले अनुभवच दिसतात. जसे की मोंटाना मधला अनुभव."

दोन वर्षे संपता संपता बोलल्याप्रमाणे तो मोंटाना विश्वविद्यालयात जाऊन त्या प्राध्यापकांसमोर उभा ठाकला. काही सांगताच याच्या अवताराकडे पाहून त्यांनी ताडलं की हाच तो जॉन. ते लगबगीनं म्हणाले बरं झालं आलास आज नोंदणी करायचा शेवटचा दिवस आहे. उद्या आला असतास तर अजून एक सत्र वाया गेलं असतं तुझं. ताबडतोब जाऊन प्रवेश घे. मग त्याने त्याची आवडती खूण केली. खिशातून आतलं अस्तर बाहेर काढलं आणि अर्थिक असहायता व्यक्त केली. ते म्हणाले "त्याचं बघू कसं करायचं ते. आधी हे दीडशे डॉलर घे आणि एका विषयासाठी तुझं नाव नोंदव. म्हणजे मग इथला विद्यार्थी म्हणून तुला इथली विभागाची किल्ली मिळेल आणि ग्रंथालयाचा वापरही तुला करता येईल. आपण बाकी प्राध्यापकांशी बोलू. तू त्यांच्या वर्गात बसायला सुरूवात कर. ते तुझे क्रेडिट्स बाजूला राखून ठेवतील. जसजशी पैशाची सोय होईल तसतसे आपण ते तुझ्या नावावर करून घेऊ" हे असं होऊ शकतं यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.

असं इथेही होऊ शकतं का?
त्यानी समोर बसलेल्या काही प्राध्यापकांकडे बघत विचारलं. त्याच्या चेहर्‍यावर अजूनही तिच कृतज्ञता उमटलेली दिसत होती. पुढची काही वाक्य तो भरभरून बोलला त्याच्या मास्टर्सबद्दल. एकदम थांबून म्हणाला," माझ्या पदवीदान समारंभास माझे वडील आले होते मुद्दामून. मला म्हणाले की त्यांना दोघांनाही माझा खूप अभिमान वाटतो. पण या शिक्षणाचा काय उपयोग? तू तर गाडी चालवत नाहीस आणि हे न बोलणं तर चालूच आहे. थोडक्यात काय तर मी अजूनही काही कामाचा नव्हतो!"

काम करणं तर भागच होतं त्याखेरीज पोटापाण्याचा प्रश्न सुटणार नव्हता. तो एका छापखान्यात काम करू लागला. ते काम शिकताना त्याच्या लक्षात आलं की या छोट्या गावात शहरातली वृत्तपत्रं तर येतात पण त्यात या गावातल्या बातम्या नसतात. त्यानी तिथल्या स्थानिक लोकांसाठी एक पत्रिका चालू केली ज्यात आजूबाजूच्या घडणार्‍या घटना आणि तिथल्या लोकांना समर्पक अशा बातम्या येऊ लागल्या. पण त्याला इथे थांबायचं नव्हतं. त्या जळक्या तेलाचा वास त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. अखेरीस पी एच डी साठी तो University of Wisconsin-Madison येथे येऊन पोचला. १९७१ मधे समुद्रामधे झालेल्या तेलगळतीचे पर्यावरणावरील परिणाम या विषयावर त्याने काम सुरू केलं. त्याला कुणीतरी सुचवलं- अरे अशा विषयावर काम केलंस तर तुला नोकरी कशी मिळणार? यावर तो काहीच बोलला नाही. अशा काही वेळी त्याच मौन फार कामास येई. खाणाखुणा आणि लिखाण यावर त्याने त्याची PhD पूर्ण केली.

२४ मार्च १९८९, अलास्का येथे आजपर्यंत मनुष्याप्राण्याकडून निसर्गाची सर्वात जास्त हानीकारक अशी घटना घडली. अमेरीकेचे एक तेलवाहू जहाज फुटले आणि ते तेल समुद्रात पसरले. थोडाथोडका नाही तर तब्बल ११,००० चौरस मैल एवढा परिसर त्याने व्यापला. बाकी रहात्या जगापासून हे फार दूरवर घडत असल्यामुळे त्याचे गांभीर्य सर्वसामान्यांना फारसे जाणवले नाही. पण जगभरातील पर्यावरणवादी मात्र अतिशय अस्वस्थ झाले. त्यावेळेस जगभरात फक्त एकच विद्यार्थी या विषयामधे संशोधन करत होता- जॉन फ्रान्सिस. त्याला फोन आला.
फोनवर एका शासकीय अधिकार्याची सहायिका बोलत होती. तिला सांगण्यात आलं की नाही तो फोनवर नाही येऊ शकत कारण तो बोलत नाही. "मग त्याला ताबडतोब इकडे पाठवून द्या. आम्ही उद्याच्या विमानाचं तिकीट पाठवतो."
"नाही तो विमान प्रवास करत नाही"
"ट्रेनचं पाठवतो"
"नाही तो कुठलंही वाहन वापरत नाही"
"मी परत फोन करते"
त्याच्या मनात आलं- चला ही तर संधी गेली.
पण तिचा परत फोन आला. "लगेच चालत नीघ. आम्ही वाट बघतो."
इथून अमेरिकेच्या पर्यावरण आणि तेलगळती या संबंधीच्या कायदेविषयक योगदानामधे त्याचा सक्रीय सहभागाला सुरूवात झाली. पीएचडी पूर्ण करून तो वॉशिंग्टन डीसी ला कामावर रूजू झाला. तिथेही तो सायकलचाच वापर करत असे. पुढे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण समितीचा तो सभासद झाला. तरी त्याचे वडील त्याला म्हाणाले, "जॉन, आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. पण जोवर तू गाडी चालवत नाहीस आणि बोलत नाहीस तोवर याचा काय उपयोग?" अखेरीस १९९० मधे त्यानी परत बोलायला सुरूवात केली. कारण इतके वर्ष ऐकून घेतल्यावर आता त्याच्या कडे बोलण्यासारखं खूप काही होतं.

त्याचं बोलणं संपलं. तसं टाळ्याचा कडकडाट झाला. बर्‍याच वेळ लोक उभे राहून टाळ्या वाजवत होते. त्याची कहाणी ऐकून सगळेच भारावले होते. मलाही सतरा वर्ष न बोललेल्या जॉनचं भारी आश्चर्य वाटलं.
बावीस वर्ष पर्यावरणासाठी पायी फिरण्यासाठी भयंकर आदर वाटला आणि अशात पीएचडी करण्याच जाम कौतुक वाटलं. पण मला जॉन खरा भिडला जेव्हा व्हेनेझुएला-ब्राझीलच्या सीमेवर मनातलं वादळ शमल्यानंतर, बावीस वर्षाच्या पायपिटीनंतर शांतपणे बसला हात करून जो बसमधे बसला. ते सांगताना तो म्हणाला,
"गेली बावीस वर्ष पर्यावरणासाठी गाडी वापरणारा जॉन, ज्याला लोक ओळखत होते, ज्याला मी ओळखत होतो तो जर गाडी वापरायला लागला तर कसं चालेल? जॉन "जॉन" राहणारच नाही. त्याची ओळख बदलून जाईल. कदाचित नाहीशी होईल. मग उरलेला जॉन कसा असेल. त्याला लोक स्वीकारतील का? त्याहीपेक्षा त्याला आपण स्वीकारू का? असे अनेक प्रश्न मनात गोंगाट करत होते. मी केलेल्या निश्चयाचा माझ्यासाठीच एक तुरूंग बनला होता. माझ्या अनुभवाने, माझ्या शिक्षणाने माझ्यावर आलेली जबाबदारी ही फक्त माझ्यापुरती मर्यादित नव्हती.
मी या समाजाचे आणि पर्यायाने या पर्यावरणाचेही देणे लागत होतो. त्यासाठी सर्व मार्गांनी मी समाजापर्यंत पोचणं गरजेचं होतं. हा जॉन बदलायलाच हवा. आणि मी मागून आलेल्या बसला हात केला."

माणूस आणि निसर्ग यांना एकमेकांपासून वेगळं करणं अशक्य आहे. महत्वाचं हेच आहे की ते एकमेकांशी कसे वागतात. यावर सगळ भवितव्य अवलंबून आहे- इति जॉन.