Saturday, June 13, 2009

रोता सूरज, जलता सूरज

कोण ते टिळक, गांधी, नेहरू, आझाद, पटेल, आंबेडकर?
आम्हाला स्वातंत्र्य दिलं, आम्हाला लोकशाही दिली
"अरेरे साहेब गेला! तो होता तेच भलं होतं" असं आम्ही चारचौघात म्हणू शकतो इतपतच काय ती आमची लोकशाही-
आम्ही काय मनात येईल ते बोलू शकतो. आणि काहीही न करता बसू शकतो. आणि का नाही? आम्ही रामायणं लिहीत नाही नुसती तर ती घडवतो महाराजा.
बाकी चोर्‍यामार्‍यापुरते आम्ही वाल्याचे वारस.
वाल्मिकी व्हायची वेळ येते तेव्हा मात्र आम्ही परंपरेशी नाळ तोडून
आधुनिक म्हणवायला मोकळे- शेपट्या उडवत. कोणाच्या शेपट्या? थांबा थांबा बोलू नका. लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील. आजकाल शेपट्यांच्याही वाटण्य़ा झाल्यात. मालकासमोर हालवता झुलवता येत नसतील तर मग नुसत्याच पायात घाला. उरल्याच का तरीही? मग छाटून टाका.

आम्ही खुश होतो. का तर मिलीजुली सरकार... जरा एकमेकांचा वचक राहील. एकाची सद्दी नको बुवा. का? तर म्हणे मागचा अनुभव बरा नव्हता. दगडापेक्षा वीट मऊ. आता आम्ही खुश येवढ्यासाठीच की एकसंध सरकार आलं. तुकड्या तुकड्याचं नको. पायात पाय अडकून तोंडघाशी पडणं नको. का? तर म्हणे मागचा अनुभव बरा नव्हता. दगडापेक्षा वीट मऊ.
पण कुठला अनुभव कधी बरा होता? सांगा ना?
कोण दगड? कोण वीट? सांगा ना?
शेवटी आपल्या हाती काय- दगड आणि विटा!
कोणीतरी आपल्या डोळ्यात धूळफेक करायची
आणि मग आम्ही मोकळे एकमेकांवर दगडफेक करायला
तुमचा पक्ष कोणता? तुमचा गट कोणता?
तुमचा कोण? राम, नानक, बुद्ध, अल्ला की येशू?
का या यादीत नसलेले किंवा असलेले कोणी?
आम्ही बुवा शिकलेले.
गट नसलेल्यांच्या गटातले, धर्म नसलेल्यांच्या धर्मातले
आमचा कशाशीच संबंध नाही. आम्ही तटस्थ.
नेरोनी रोममधे माणसं जाळली जिवंत तेव्हा आम्ही तटस्थ होतो
डायरचं जालियनवाला झालं तेव्हाही आम्ही तटस्थ होतो
आणि अशा कित्येक घटना घडून गेल्या मधे
आणि आता कित्येक घडताहेत प्रत्येक दिवशी पण आम्ही तटस्थ
काहीच कसं करत नाही म्हणता?
आम्ही बोलतो ना- संयमाने, संतापाने, पोटतिडकीने
आम्ही लिहीतो ना असं काही तरी- गुळमुळीत, खुसखुशीत आणि जळजळीतही
आणि स्वप्न बघतो हे सगळं बदलण्याची
कायदा आहे ना हे सगळं बदलायला.....

कायदा समाज व्यवस्था बदलू शकत नाही
कारण कायद्याला पळवाटा असतात.
कायदा फक्त समाजव्यवस्था राखत असतो.
त्यामुळे समाज व्यवस्थेमधे जे शिखरावर त्यांच्या हाती कायदा, ते म्हणतील तो कायदा. चाबूक गाडीवाल्याच्या हातात द्या नाहीतर बैलांच्या वळ उठायचे ते उठणारच. कारण ज्याच्या हातात चाबूक तो दिशा ठरवणार. सोय इतकीच की त्यातल्या त्यात आलटून पालटून मार खा आणि दिशा बदलत दिशाहीन वाटचाल करत रहा. त्यातच आम्हाला लोकशाहीचे सार्थक झाल्याचे समाधान
***

सूरजको भी रोते हुए यहाँ हमनें देखा है ।
पहली किरण की मौत होते यहा हमनें देखा है ।।
चांदनीसे झुलस गयी रात कितनी काली है ।
चंदा के माथेपर किसने लिखी हुई एक गाली है ॥१
आधा खाया आधा छोडा बरगद अकेला खडा है ।
भूखा प्यासा काला बादल पत्थर होके पडा है ।।
मधुशालाके बाहर सुस्ताया काला जहरीला सपना है ।
जिसने अपना खून पिया वह समय भी तो अपना है ।।२
लंगडी, अंधी, काली बिल्ली रास्ता रोके खडी है ।
मंदिरसे निकली बूढी चुडैल दीवारोंपर चढी है ।।
रोशनीमे टंगी परछाई सायेसे भी डरती है ।
नसीब बुननेवाली मकडी जाल में फसकर मरती है ।।३
भीष्म-द्रोण की मुंडी काटे दुर्योधन सब झूम रहे हैं ।
दधीचि की हड्डी लेकर पागल कुत्ते घूम रहे हैं ।।
कुरुक्षेत्रका वस्त्र माँगकर सूतपुत्र पछताया है ।
पांचजन्यकी राह देखकर रण में अर्जुन सोया है ।।४

पलकें जलकर राख हो गयी
पडा हुआ था लकडी बनकर ।।
आएगा आएगा गिरिधर
नवजीवन की वर्षा लेकर ।।५

क्षितीज किनारे आँखे डाले कितने ही युग बैठा था ।
बैठा था; बैठा ही रहा, बैठा ही रहा, बैठा ही रहा, बैठा ही रहा, बैठा ही रहा.........

.

Saturday, June 06, 2009

आवर रे सावर रे.....

स्निग्ध संधिप्रकाशाच्या आडोशाला लपली होती अभिसारिका रजनी!
वासरांच्या पापण्या मिटू लागल्या तशी ती रात्र मेघांचं अवगुंठन दातांत धरून हलक्या पावलाने पुढे आली. तूही तशीच आलीस सभागारात, शरावतीच्या तरंगांच्या जीवघेण्या संथ लयीत.
इंदीवर कमळासारख्या निळ्या रंगाचं लज्जावस्त्र ओढून. आज म्हणे त्या सुप्रसिद्ध पखवाजियाचा सारा अभिमान आपल्या नृत्यकौशल्यानं उतरवून टाकण्याचा पण केला होतास तू.
’माझ्या वादनाच्या गतीच्या तोलाची नर्तिका अजून जन्मली नाही’
हे त्याचे बोल ऐकलेस तेव्हा खदिरांगार उतरला होता म्हणे तुझ्या डोळ्यांत.
स्वीकारलंस ते आवृत्त आव्हान!
आतल्या अग्निशिखेचा तो दाह शमवायला का गं अशी शीतल निळाई लेवून आली होतीस? सभेला वंदन करण्यासाठी एका लयदार झोक्यात तू ते अंशुक दूर केलंस आणि तुझ्या डोळ्यांतल्या किरणप्रभेनं दीपून गेलो मी.

पण पखवाजावर स्थिरावलेल्या हातांचा स्वामी शांत होता.
एक अभिनिवेशी हास्य त्याच्या चेहर्‍यावर विसावलं होतं.
कत्‌ धि ट धि ट, धा - ,ग ती ट, ती ट ता -
गम्भीर बोल उमटले त्याच्या मुखातून.

तू हातांचा नागबंध कानाशी नेऊन अतिशय लक्षपूर्वक ऐकत होतीस भुवया उंचावून.
धमार!
क्षणैक लवलेली तुझी मान आणि लगोलग सुरू झालेला तो पदन्यास.
एकेका तुकड्यासरशी त्याच्या हातांची गती वाढत होती आणि तुझे पाय सहजपणे त्या गतीवर विहरत होते.
तू कथा सुरू केलीस...
एकपट.
तो भांडून तंटून निघून गेला आहे..ती सुन्न, विमनस्क बसून आहे तरुतळी.
दुप्पट.
थरथर..दाह.. ती उठते..त्यांचं गूज ठाऊक असलेल्या वेलीवेलीला, पानापानांना विचारू लागते..असाकसा निघून गेला तो मला एकटीला टाकून?

चौपट..
वर्तुळाकार घुमणं तिचं..काय करू? कुठे शोधू?..ये ना, सख्या ये ना..सजणा, जिवीच्या जिवलगा.. माझ्या अमृतमय प्राणा, ये ना!
पखवाजियाच्या हातांमध्ये दाहक कली शिरला. त्या शांत मुद्रेवरचं हास्य कधीच विरलं. भरून आले त्याचे डोळे. देवचार अंगात शिरल्याप्रमाणे तांडव सुरू झालं पखवाजाच्या गालांवर.
तुझ्या कपाळी स्वेदबिंदू डबडबलेले. पण तरीही नाचतच होतीस तू धूम्रवेलीसारखी वेगात..वेगात..अजून वेगात!
पण नाही साहवत आता..तिचा चेहरा बोलत होता..नको अंत पाहू..
डोळे मिटण्यापूर्वी एकवार दर्शन दे.. केवळ एकवार!
धूम्रवेल थरथरली..तू आता कोसळणार!
पण समेवर त्या एका क्षणात तुझी त्याच्याशी दृष्टभेट झाली...
तुझ्या डोळ्यांची आभा आणि त्याच्या डोळ्यांचं पाणी
एक इन्द्रधनू प्रकट होताना मी पाहिलं!
पुनश्च एकपट.

आवर रे, सावर रे मन तुझे खुळे
स्वप्नांच्या काठावरी आनंदाचे तळे

पावसाचे मोती येती गंधवती माती
ओलावला वारा सारा थरारती पाती
दिशा कशा वेड्यापिशा झालेनासे कळे
आवर गं, सावर गं मन माझे खुळे
आवर रे, सावर रे मन तुझे खुळे स्वप्नांच्या काठावरी आनंदाचे तळे

आकाशीच्या कपाशीच्या वाती राती निळ्या
अंधाराच्या गंधाराला प्रकाशाच्या कळ्या
पुनवेच्या चांदण्याला पंचमीचे झुले
आवर गं, सावर गं मन माझे खुळे
आवर रे, सावर रे मन तुझे खुळे स्वप्नांच्या काठावरी आनंदाचे तळे

कोकिळेला गळामिठी मारव्याची खूण
भ्रमराच्या अधरावर मकरंदी ऋण
चंदनाच्या झाडालागी प्राजक्तीची फुले
आवर गं, सावर गं मन माझे खुळे
आवर रे, सावर रे मन तुझे खुळे स्वप्नांच्या काठावरी आनंदाचे तळे

अधीर तरू मदिर झरे मोहरली काया
रानी वनी जपे कानी आठवांचा फाया
केतकीच्या बनी मनी कस्तुरीचे मळे
आवर गं, सावर गं मन माझे खुळे
आवर रे, सावर रे मन तुझे खुळे स्वप्नांच्या काठावरी आनंदाचे तळे

..