सगळं सोडलंस म्हणतोस? अगदी सगळं?
प्रत्येक सूत, प्रत्येक धागा, प्रत्येक नातं, प्रत्येक प्रेम, प्रत्येक द्वेष... सगळं.
मग तो आत्ताचा उसासा......
सगळ्या जगाला माफ केलंस पण स्वतःला केलंस का मुक्त त्या एका अपराधातून? का म्हणूनच घेऊन आलास ते मातृत्वाचं स्वप्न कोणाच्या नकळत? मला माहीत आहे- हा सृजनाचा ध्यास त्याशिवायचा नाहीच मुळी.
नवीन जमीन कसतोयस. नवी सृष्टी स्थापतोयस. नवा कसा वसवतोयस. नव्यानं जगायचं म्हणतोयस- त्या एका अपराधाला कुशीला घेऊन. पेर, पेर ते दुःख प्रत्येक नव्या स्वप्नाच्या मुळाशी. ती तांबडी आई ’नाही’ नाई म्हणायची. सगळं पोटाशी घेईल आणि फक्त आनंद देईल भरभरून. आई अशीच असते रे! ती नाही राग ठेवायची मनात.
तू काय ओळखत नव्हतास तुझ्या आईला? पण कर्तव्य मोठं असतं असंच शिकलास तू. तिनंच तर शिकवलं होतं. त्या कर्तव्यापोटी तर घाव घातलास त्या कल्पद्रुमेवर आणि मग नंतरच्या एका वणव्यात सगळं घरटच जळालं. तू सार्या जगावर रागेजलास. जळालेल्या एकेका काटकीसाठी सूड घेत राहीलास परत परत. जळत राहिलास आतल्या आत. जाळत राहिलास पुन्हा पुन्हा. एकवीस वेळा.
त्या वणव्याचा सूड तर कधीचाच संपला होता घेऊन पण तरी ती आग काही शमत नव्हती. रागाचा भडका उडतच होता आणि परत एकदा त्याचा स्फोट झाला. इतका जिवापाड जपलेला तो शिवांश, तो काय पोरखेळ आहे की खेळायला घ्यावं अन मोडावं. तू परत एकदा विनाश यज्ञाचे आवर्तन आरंभायला सज्ज झालास.
पण तो शाम वर्ण, ते करुणामय डोळे...
काय जादू केली त्याने कोण जाणे? सगळा अंगार शमला. धग शीतल झाली. राखेचा जणू चंदन लेप बनला.
मागे उरलं फक्त त्या एका घावाचं दुःख! सगळ्या संहाराला पुरून उरलेलं दुःख! ते विनाशानं उद्ध्वस्त होणारं नव्हतं, ते अनुतापानं विरघळणारंही नव्हतं. एकच मार्ग होता- सृजनाचा. आणि तू सगळं सोडून इथे आलास या वैराण भूमीत.
हे द्विजरामा, आता थांबू नकोस.
हा सह्याद्री तुझ्या पाठीशी आहे आणि अख्खा समुद्र त्याच्या फेसाळत्या लाटांनी तुझ्या स्वागताच्या गर्जना करतो आहे. आता मागे वळून पाहणे नाही. थकायला उसंत नाही. हे आभाळभर दुःख या भूमीला वहायचं आहे. आता मुक्तीचा हाच एक मार्ग!
जुनाट काळे कुरतडलेले
खुशाल आलो घरटे मोडुन
धुरकट दुबळे चिंधीचिरगुट,
गडवी- मडकी आलो सोडुन
दृष्टीपुढती अभिनव सृष्टी
उधळी मोती अथांग सागर
इंद्रधनूने महिरपलेले
गगन नव्या स्वप्नांचे आगर
भिती कशाला काळोखाची
मनी जागते नित्य ऊषा
खुणवी तारे खुलवी वारे
दाखवी रवी नित् नवी दिशा
धरेस सीमा क्षितिजाची पण
आकाशाला नाही कुंपण
तमा कशाची तन मन माझे
निळ्या निळाईसाठी अर्पण
पोलादाच्या आकांक्षांना
एकच सलते शल्य बोचरे
पंखावरुनी हात फिरविण्या
माझे नाही कुणीच दुसरे
Tuesday, May 26, 2009
Friday, May 08, 2009
चल तर जाऊ
हे कृष्णसखे,
आवर गं आवर तुझे अश्रू. यमुनेला पूर कसा अनावर झालाय बघ. वासरं अगदी कासावीस झालीत. आयांच्या मानेखाली तोंड खुपसून भीती लपवण्याचा प्रयत्न करतायत. हा पूर आवरायला तो नाही गं इथे कुठे. एका करंगळीवर अख्खा दुःखाचा डोंगर लीलया पेलणारा तो नाही येणार आता. बेईमान, आता कसा डोंगरायेवढं दुःख तुझ्या पदराशी बांधून गेलाय. तू तर कधी कुंतीसारखं दुःख मागितलं नव्हतंस! किंबहुना तू तर कधी काही मागितलंच नव्हतंस. मागणारा तो होता, हट्ट करणारा तो होता, झाकून दडवून ठेवलेलं चोरून नेणारा तो होता आणि लाडीगोडीनं बळजोरी करणाराही तोच होता. तू फक्त कायम होकार भरत राहिलीस. अगदी जेव्हा तो जाण्यासाठी निघाला तेव्हासुद्धा तू मुक्यानेच फक्त हो म्हणालीस. तुला खात्री होती की जर तू म्हणाली असतीस," कान्हा, नको रे जाऊस" तर तो गेला नसता. खरंच?
तो यशोदेचा पोर त्या वेळूच्या बनातून त्याला घरी पोचवताना काही पावलांत बाल्य ओलांडून तरूण झाला. तो कदंब साक्षी आहे. त्या बासरीनं जणू गारुड केलं होतं आसमंतावर. तो अशोक बहरला फुलांनी तशी मालती अजूनच बिलगली त्याला. यमुनेच्या डोहावर सारंग पक्षाचं एक जोडपं उतरलं होतं ते उगच एकमेकांवर पाणी उडवत होते. किती युगांचं अंतर गेलं मधे कोण जाणे.
अजूनही पाण्यावरून येताना, करवंदामागून खडा मारल्यासारखा त्याचा प्रश्न येईल, "चल, येतेस?"
पण तुझा निश्चय मात्र पक्का आहे यावेळी.
आता काही तू हो म्हणायची नाहीस. खरंच ना?
राधे!!
चल तर जाऊ-
पण, नको जिन्यावर, नको गच्चीवर
आम्रतरूंच्या घनरानातील, बकुळफुलांची अस्फुटलेली
शय्या कधीची झुरते आहे
मुरलीची धुन विरते आहे
आठवणीने आठवणींचे मोरपीस ते ठेव बरोबर
चल तर जाऊ-
पण, नकोच दिवसा, नकोच रात्री
अंधाराला उसवत फसवत, आकाशाची रेशीम छत्री
फुले चमकती वेचुन गेली
धुके गुलाबी वरती खाली
आठवणीने अबोलकीशी चंद्रकोर ती ठेव बरोबर
चल तर जाऊ-
पण, नको बोलणे, नको अबोला
चित्तचोरटी नेत्रपल्लवी, सलज्ज हळवे सजल इशारे
कवितेच्या विस्मरल्या ओळी
दोन आसवे शापित भोळी
आठवणीने भैरवीतले सूर अभोगी ठेव बरोबर
आवर गं आवर तुझे अश्रू. यमुनेला पूर कसा अनावर झालाय बघ. वासरं अगदी कासावीस झालीत. आयांच्या मानेखाली तोंड खुपसून भीती लपवण्याचा प्रयत्न करतायत. हा पूर आवरायला तो नाही गं इथे कुठे. एका करंगळीवर अख्खा दुःखाचा डोंगर लीलया पेलणारा तो नाही येणार आता. बेईमान, आता कसा डोंगरायेवढं दुःख तुझ्या पदराशी बांधून गेलाय. तू तर कधी कुंतीसारखं दुःख मागितलं नव्हतंस! किंबहुना तू तर कधी काही मागितलंच नव्हतंस. मागणारा तो होता, हट्ट करणारा तो होता, झाकून दडवून ठेवलेलं चोरून नेणारा तो होता आणि लाडीगोडीनं बळजोरी करणाराही तोच होता. तू फक्त कायम होकार भरत राहिलीस. अगदी जेव्हा तो जाण्यासाठी निघाला तेव्हासुद्धा तू मुक्यानेच फक्त हो म्हणालीस. तुला खात्री होती की जर तू म्हणाली असतीस," कान्हा, नको रे जाऊस" तर तो गेला नसता. खरंच?
तो यशोदेचा पोर त्या वेळूच्या बनातून त्याला घरी पोचवताना काही पावलांत बाल्य ओलांडून तरूण झाला. तो कदंब साक्षी आहे. त्या बासरीनं जणू गारुड केलं होतं आसमंतावर. तो अशोक बहरला फुलांनी तशी मालती अजूनच बिलगली त्याला. यमुनेच्या डोहावर सारंग पक्षाचं एक जोडपं उतरलं होतं ते उगच एकमेकांवर पाणी उडवत होते. किती युगांचं अंतर गेलं मधे कोण जाणे.
अजूनही पाण्यावरून येताना, करवंदामागून खडा मारल्यासारखा त्याचा प्रश्न येईल, "चल, येतेस?"
पण तुझा निश्चय मात्र पक्का आहे यावेळी.
आता काही तू हो म्हणायची नाहीस. खरंच ना?
राधे!!
चल तर जाऊ-
पण, नको जिन्यावर, नको गच्चीवर
आम्रतरूंच्या घनरानातील, बकुळफुलांची अस्फुटलेली
शय्या कधीची झुरते आहे
मुरलीची धुन विरते आहे
आठवणीने आठवणींचे मोरपीस ते ठेव बरोबर
चल तर जाऊ-
पण, नकोच दिवसा, नकोच रात्री
अंधाराला उसवत फसवत, आकाशाची रेशीम छत्री
फुले चमकती वेचुन गेली
धुके गुलाबी वरती खाली
आठवणीने अबोलकीशी चंद्रकोर ती ठेव बरोबर
चल तर जाऊ-
पण, नको बोलणे, नको अबोला
चित्तचोरटी नेत्रपल्लवी, सलज्ज हळवे सजल इशारे
कवितेच्या विस्मरल्या ओळी
दोन आसवे शापित भोळी
आठवणीने भैरवीतले सूर अभोगी ठेव बरोबर
Subscribe to:
Posts (Atom)