Thursday, April 06, 2006

बांधावर...

पाणीभरला घडा घेऊन बांधावरून जाताना
खरं सांग,
तुला बघून झुकलेला तो बाभूळ
तुला कधी दिसलाच नाही का ?

पाण्यावरून येताना तू दूरवर दिसलीस तसा
अंगभर नवी हळद लेऊन
तो एकटक बघत राहीला
तुला जवळ येताना.

झिम्मा खेळून, दंगा करून
घडाभरलं थोडं पाणी
हेंदकाळून तिच्या कानशिलावर उतरलं
अन चोळी भिजवत आत शिरलं
तो शहारला अंगभर
त्याच्या अंगावर काटा आला

वाऱ्यावर पोरांसारखा
सैरावैरा धावणारा तो पदर
अडकला वेंधळ्या काट्यामधे
तर अलगद सोडवताना त्या कट्यालाही जखम झाली

त्या पायदळी फुलांकरता
जखमी घायाळ काट्याकरता
तुझा सहानभूतीचा सुस्कारा....................

त्या वेड्याला कळलंच नाही
तो त्या नखभर फाटल्या पदरासाठी होता.

- प्रसाद

Wednesday, March 29, 2006

आधारवेल ~ 2



पण मी का होतो? हेच मला माहित नव्हतं.
अर्थात मला त्याची चिंताही नव्हती.
कारण माझं असणंच माझ्यासाठी पुरेसं होतं

पण......

compiled in the latest post...

Saturday, March 25, 2006

आधारवेल ~1


मी कोण आहे? कोण आहे मी?
एक चैतन्यरहीत अस्तित्व!

मी एक खुरटलेला वड आहे.
वठलेला, थकलेला, कंबरेत वाकलेला,
पानन पान पिकलेला, पारंब्या सुकलेला

मी एक खुरटलेला वड आहे.

compiled in the latest post...

Friday, March 24, 2006

स्पर्श चांदण्याचा


एका मैत्रीणीचा ब्लॉग वाचत होतो मनाला एकदम भावला आणि वाचता वाचता या छायाचित्राची आठवण झाली.
-------
तेवढ्यात कुणाचंसं ओळखीचं हसू दिसलं. बडिशेपेच्या बशीत शेवटी राहिलेल्या कंटाळवाण्या दाण्यांमध्ये अचानक खडीसाखरेचा इवला तुकडा चमकून जावा तस्सं वाटलं. एका स्मितहास्यात काय जादू असते सगळा माहौल बदलवून टाकण्याची! 'मूड' अगदीच विस्कटलेला नसेल, तर समोरच्याचं हसणं आपल्याही चेहऱ्यात उमटतं पाहतापाहता. त्यातसुद्धा, बघितलेलं हसणं प्रीती झिंटासारखं खळीदार असेल तर संदीप खरेच्या शब्दांत " असे हालते आत हळुवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा!"
------------ इति गायत्री (http://bolaacheekadhee.blogspot.com/)

Thursday, March 23, 2006

निरोप

हा प्रवास काही चुकत नाही. म्हणजे त्यात तसा आमचाही हात होताच. शीडे उभारून आम्ही कायमचे तयार. मग वारा वाहतो म्हणून तक्रार तरी का करावी? पण शीडं उतरवली तरी या लाटा काय स्वस्थ बसू देतात? आमची आपली भटकंती चालूच. तसं थांबतो घडी दोन घडी इथं तिथं. असेलच नशीबात तर मुक्कामही घडतो एखादा. कधी कधी काळ आ वासून बघत रहातो आपल्याच तोंडाकडे मख्खासारखा. पण यात स्वेच्छेचा भाग कितपत असतो देव जाणे. म्हणूनच कशातही न अडकता एखाद्या फकीराप्रमाणे भणंग रहावं. मागच्या मुक्कामी हे गणित चुकलं कुठेतरी. मुक्कामही तसा फारसा नव्हता. असेल फार तर एखाद्या वामकुक्षी इतका. पण त्यातल्या स्वप्नांशी रेषीम धागे जोडले गेले नकळत. जशी झोप उडाली ही स्वप्नही उडाली भुर्ररकन. आणि मी अस्वस्थ झालो.

निरोप

ते घरटं सोडल्याला आता बरेच दिवस झाले
सगळे झरोके बंद केले
पार्‍यासारखी विखुरलेली माझी सावली
आटोपशीरपणे आवरून मी निघालो

पण कसं कोण जाणे
एक खिडकी उघडीच राहिली आठवणींची
त्यामुळे भूतकाळातील चिमण्या अशा कधीही भुरभुरत आत शिरतात
आणि मी चिवचिवाटानं काठोकाठ भरून जातो

प्रकाशाच्या वाटेलाच पाऊलं दान केली
अन डोळे बांधलेत अज्ञाताला
मागे यायला वाट नाही
मागं यायचं कारणही नाही
काही कवडसे मात्र ठेवलेत घट्ट मुठीत धरून
नशीब, या चिमण्यांची तरी सोबत आहे

इथेही तंबोरे लागलेत
षड्ज अगदी नेमका गवसलाय
पण तशी मारव्याची तान पुन्हा गाणं अवघड आहे
हा सव्यापसव्य कशासाठी?
तर निरोप घ्यायचा राहून गेला
अर्थात निरोप कसचा घ्यायचा म्हणा
तुमच्या अन माझ्या दोघांच्याही अंगणात याच तर दाणे टिपतायत
चिवचिवत भुरभुरणार्‍या याच चिमण्या

................. प्रसाद

Saturday, March 18, 2006

हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

दूरचित्रवाणीवर वाहीन्यांचा सुळसुळाट होण्यापूर्वी दूरदर्शनवर काही चांगले कार्यक्रम लागायचे. 'महाश्वेता' ही अशीच एक वाट बघायला लावणारी मालीका. मनाला हुरहुर लावणा~या कथानकावर आधारीत ही मालिका कदाचित काही दिवसांनी स्मृतीपटलावर पुसटशी होईल.
पण त्यातल्या दोन गोष्टी मात्र कायम स्मरणात राहतील. एक म्हणजे ऎश्वर्या नारकर. (इथे अपरीहार्य आठवण झाली जी सांगीतल्या खेरीज पुढे जाणे शक्य नाही ती म्हणजे 'श्रीकांत' मधली मृणाल देव)
आणि दुसरे म्हणजे त्याचे शीर्षक गीत.
कवी ग्रेस यांची ही कविता. ह्रदयनाथ मंगेशकरांची चाल. आणि दुधात साखर म्हणजे लताबाईंचा आवाज. या तिनही गोष्टी इतक्या छान जमून आल्या आहेत की काय विचारता. अप्रतिम! अप्रतिम! अप्रतिम! अप्रतिम!"

झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया" या ओळींशी मी पुन्हा पुन्हा थबकतो. ते उगवणं मनातल्या मनात अनुभवत त्या झाडाखालचा विसावा या ओळींमधे शोधत राहतो.

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गाते
तू मला शिकवीली गीते

हे झरे चंद्र सजणांचे
ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल
जणु अंगी राघव शेला

स्तोत्रात इन्द्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे
- ग्रेस


जेव्हा जेव्हा एकटा असतो मुक्यानेच ही कविता आतल्या आत पित असतो, चवीचवीने. आणि या शेवटच्या ओळीमधे मीच कधीसा विरघळून जातो माझे मलाच कळत नाही.
स्तोत्रात इन्द्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

Thursday, March 09, 2006

भगवान


वि. वा. शिरवाडकरांची एक कथा "नास्तिक" वाचण्यात आली. कथा जरी काल्पनिक असली तरी विचार करायला लावणारी होती. गेल्या काही वर्षातल्या अनेक घटनांची मालीका डोळ्यासमोर उभी राहीली. माझ्या अस्तिकते बद्द्ल अनेक प्रश्न मनात उमटले. कालांतराने सगळे निवळले. माझी मला उत्तरे मिळाली. या शब्दांचे अर्थ निदान माझ्यापुरते तपासून त्यांची परत 'प्रतिष्ठापना' करण्यात आली. तरी तो धागा कुठेतरी तसाच राहीला असावा आणि नंतर वाचायला घेतलेल्या 'गुलज़ार' मधे तो नकळत मिसळला असावा. ही कविता कशी सुचली याला हेच उत्तर मी देऊ शकतो.

Saturday, March 04, 2006

कांचनांची निरांजने

जीवनाची वाट ... खाच खळगे, काटेकुटे, कभीन्न काळोख....

नाही नाही, उगीच खोटे कशाला बॊलू. आमचा प्रवास सुरू झाला तो मुळी गाडीरस्त्यावरून. आता तर महामार्गाला लागलो आहोत. आणि प्रकाशाचं विचाराल तर शतसूर्य सोबतीला आहेत. काही प्रत्यक्श्य भेटले काही वाचनातून अनुभवले. त्यामुळे अंधाराची भिती कधी वाटली नाही. भीती होती वेगाची. धावता धावता पावले जड होतात, पाय अडखळतो, ठेच लागते, डोळ्यासमोर अंधारी येते..............अचानक काही उबदार कवडसे चमकून जातात. जखमेवर हळुवार फुंकर घातल्यासारखी. वाटतं रस्ता सोडून खाचखळग्याच्या वाटेला वळावं. तिथेच अंधारात एखाद्या दगडाला टेकून मिणमिणत्या निरांजनाची ऊब अनुभवत रहावं.

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणु नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकूळ केव्हा
त्या माजघरातील मंद दिव्याची वात

माझ्या वडीलांची आजी आणि आईची आजी दोघीही दीर्घायुषी होत्या. त्या अमृताचा अनुभव मी आत्ता आत्ता पर्यंत घेतला. त्या ओथंबलेल्या प्रेमाला कुठलीच अपेक्शा नव्हती. तो सुरकुतलेला स्पर्श, जाळीदार नक्शीचा चेहरा, कातर आवाज, दंतविहीन मुखातून कोलांट्या खाणारे शब्द आणि किलकिल्या डोळ्यातून जीवापाड ओसंडणारी माया........................
मला चटकन बोरकरांच्या कवितेतला एक शब्द सुचला "कांचनांची निरांजने". ही निरांजने हळूहळू मालवताना मी पाहीली. त्या भावनांचे स्पंदन असे काहीसे शब्दात उमटले.
कधी कधी सगळे शब्दचं बोजड वाटतात. तरीही.........................
***********

तुळस

काळ आमच्या दारासमोरली तुळस वारली
परसाला सुतक लागलं
बहुदा आसपास ती अखेरचीच असावी... तिच्यासारखी
वृंदावन छत्र गमावल्यागत मुकं मुकं झालं
त्याचा आधारच गेला जणू
समईने हुंदका आवरत पदर लावला डोळ्याला
वारा बासरीचे सूर शोधतोय वाळलेल्या मंजिर्‍यातून
उंबरठा कळवळला ठेच लागल्यासारखा
अन गोठा मुसमुसतोय कालपासून
तिच्या राखेचे कण वेचत रांगोळी सुन्न

दूरस्थात उभा कोणी
थरथरत भिजतोय
केशरी देठांच्या आसवांतून
पारिजात होऊन!

................. प्रसाद

Sunday, February 26, 2006

दुवा


तो एकटाच बरसत राहीला एकांड्या शिलेदारा सारखा

सारी धरती त्याला गंधीत करयची होती

त्याचं स्वप्न होतं तिला हिरवेपणी बघण्याचं

तो ऊर फुटोस्तोवर गडगडत राहीला

अगदी शेवटच्या थेंबापर्यंत

काळ्या फत्थरावरचा थेंब अन थेंब कुणी पुसला जणु

त्या काळतोंड्याच्या चेहयावर जीवनाची रेषाही हालली नाही

तो निरशेने इतका गुदमरला इतका गुदमरला

की अखेरीस फुटला,

आकाशात विरून गेला

चार दगडंच्या फटीतून डोकावणारा हिरवा हात

दुवा देत राहीला

नुकत्याच अनुभवलेल्या आज्ञात विधात्यास

त्या दिवंगत जीवनदात्याला

तेवढीच एक श्रद्धांजली !

Friday, February 24, 2006

मायबोली



माझी मायबोली आज आली माहेराला

नेसलीसे भागवत नाथाची पैठणी
आंगी चोळी गाथा शोभे तुकयाची नामी
ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी मळवट भाळा

माझी मायबोली आज आली माहेराला
माझी मायबोली आज आली माहेराला

- सोपानदेव चौधरी