त्या कविता मी पहिल्यांदा ऐकल्या त्या त्यांनी वाचलेल्या. पु.ल. जाऊन वर्ष झालं तेव्हाच्या ’कवितांजली’ या कार्यक्रमात त्यांनी त्या सादर केल्या अगदी ... शेवटच्या दोन. तो काव्यवाचनाचा कार्यक्रम सुंदर आहेच पण त्या दोन कवितांचं सुनीताबाईंनी केलेलं सादरीकरण हे केवळ अविस्मरणीय आहे. दोन्ही कविता पद्माबाईंच्या आहेत. पण त्या आपल्या कशा झाल्या याचा खुमासदार किस्सा सांगून पुढे त्या कविता सुनीताबाईंनी समोर जिवंत उभ्या केल्या आणि त्या खरंच त्यांच्या झाल्यासारख्या वाटल्या.
कार्यक्रमाचा शेवट केला तो या कवितेने-
’आताशा मी नसतेच इथे..
जरी माझी इथे ये जा असली तरी
आताशा मी नसतेच इथे’
मला तोपर्यंत माहीत नव्हतं की कविता वाचतानाही रागदारीसारख्या मोक्याच्या जागा घेता येतात आणि ऐकणार्याच्या तोंडून आपसूक दाद बाहेर पडते. काही जागा कवीने घेतलेल्या असतात : कविता वाचताना त्या अधिक खुलवून दाखवाव्या लागतात आणि काही जागा कविता वाचणारा स्वतः निर्माण करत असतो. त्यातून किती तरी नवे अर्थ तो आपल्यापर्यंत पोहोचवत असतो या कवितेत किती तरी जागा अशा होत्या की अंगावर सरसरून काटा यावा..
’सोबत ना? आहे की आपल्या त्या यांची...
नावही आहे त्यांना, पण मला ना आता काही आठवतच नाही’
किंवा
’ते काठाकाठाने जे निर्माल्य वाहताय ना
त्यात आणि त्याच्या ताज्या ताज्या स्वप्नात’
किंवा
’वस्त्रं कधीचीच गेलीयेत कदंबावर अंतरपाट व्हायला
मी झालीय एक गाणं निळ्या नदीत वाहणारं’
ते निळं गाणं थांबलं आता.. ही शांतता हुरहूर लावणारी आहे.
*****
यातील
काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय, कळतंय ना...
इथे सुनीताबाईंनी घेतलेली ’कळतंय ना’ वरची तिहाई... वेदनेत रुतत जाणारी.काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय, कळतंय ना...
आह!
चाफ्याच्या झाडा
चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा,
का बरं आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं
दु:ख उरलं नाही आता मनात
फुलांचा पांढरा पानांचा हिरवा
रंग तुझा रमतो माझ्या मनात
केसात राखडी आणि पायात फुगडी
मी वेडीभाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा,
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्याच आळ्यात एक पाय तळ्यातएक पाय मळ्यात खेळलोय ना
जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर
बसून आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा,
मनात पानात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय, कळतंय ना
चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा,
हसून जगायचं ठरलंय ना
कुठं नाही बोलायचं मनातच ठेवायचं
ओंजळ फुलांनी भरलीय ना
- पद्मा गोळे