Wednesday, April 09, 2008

हिवाळा

मुंबईमधे थंडी वाजणे आणि मुलगी लाजणे या गोष्टी दुर्मिळ. पु लं नी सांगीतल्या प्रमाणे इथे फक्त उन्हाळा आणि पावसाळा. वसंत इथे फक्त बाल्कनीतील फुलझाडापुरता येतो. "तीच्यासाठी मी आज ७.३५ ची लोकल चुकवली!" मुंबैकराला इतपतच रोमांटीक होणं परवडतं. नारायण सूर्व्यांचा मुंबईकर भाकरीचा चंद्र शोधण्याच्या वंचनेत असतो. बाकी मलाबार, कुलाब्याची मराठीशी नाळ कधीच तुटली. इथल्या गर्दीत बोरकर, करंदीकर, शिरवाडकर असे कुठल्याही करांना पाय ठेवायला जागा नाही. नाही म्हणायला तळणीच्या जळक्या कढईमधे जगण्याची गाज जागवणारे मर्ढेकर मात्र या गर्दीत लीलया मिसळून गेले आणि तितक्याच सहजतेने मुंबईकर त्यांना विसरला. पण त्यांच्या दादाईझमचा साक्षात्कार मुंबई पदोपदी देत असते. भींतीवर चढून पाला खाणारी बकरी, भोळीभाबडी मालगाडी, अबोल फलाटदादा, पिपातले उंदीर हे सारे वाचण्यासाठी डोळे बंद करावे लागत नाहीत किंबहूना डोळे लख्ख उघडावे लागतात. त्यांची कविता कल्पनेत रमत नाही पण जरा जपून ..... वरवर बघायला गेलात तर अर्थ हारवून बसाल. ”भंगूदे काठीण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे’’ म्हणणारा हा कवी रोम्यांटीसीझम पासून कायम लांब राहीला आणि कदाचीत त्याचमुळे प्रसिद्धीपासून.
पण त्यांची प्रत्येक कविता जणू सुचवत असते--
"आम्हास आम्ही पुन्हा पहावे काढून चष्मा डोळ्यावरचा"

मर्ढेकरांची आठवण काढण्याचे प्रयॊजन हे की गेल्या महीन्यात कधीतरी एक कविता लिहीली गेली. नंतर वाचताना माझे मलाच जाणवले की मर्ढेकरांची ’पितात सारे गोड हिवाळा’ कुठेतरी त्यात झिरपली आहे. कदाचित माझा भ्रमही असेल, कदाचित मुंबई हाच एक दुवा असेल. काहीही असो पण मुंबईत रहायला आलो नसतो तर मला मर्ढेकर कळले नसते हे मात्र खरं!
आणि हो इतके दिवस ही कविता एका वहीच्या एका कोपर्यात औडकचौडक उतरवली होती ती इथे आली ते गायत्रीच्या कविते मुळे. तिथला हिवाळा आणि इथला यातील विसंगती गमतीशीर वाटली.

हो कुणीतरी धक्का दिल्याखेरीज अस्मादिकांकडून काहीही होत नाही................

********

मुंबईची कसनुसली थंडी, शेकोटी ना मफलर स्वेटर
धबधब पाऊस चिक चिक ऊन अर्धेमुर्धे त्यातील अंतर
लोकलच्या फांदीफांदीवरती पानांची ही झुंबड गर्दी
सेंट्रल, टी.टी, व्ही. टी, वाशी पडसे कायम शिंका सर्दी
बिल्डींगांची धक्काबुक्की गुदमरलेले पाडे वाड्या
दीड वितीची गल्ली कलली त्यात रांगती मोटर गाड्या
भुकी राहुनी मुकी झोपली फुटपाथाची ठिगळी झोळी
पिचल्या टाचेच्या भेगातून थंडी भरली चोळीमोळी
क्वचित् उठतो इथे शहारा आणि गारवा जातो चाटून
विझती चिमणी निजते वेळी पिते हिवाळा फुंकर मारून
पाच दहाची लोकल पकडून सकाळ येते पहाटवेळी
धुकट धुराच्या काचेवरती गतरात्रीची आठवण ओली
मुंबईची कसनुसली थंडी, शेकोटी ना मफलर स्वेटर
वसंतवेडे स्वप्न तांबडे उबवित थरथरतो गुलमोहर

6 comments:

मोरपीस said...

मस्त आहे

Gayatri said...

baaap!
"vizatee chimaNee' aaNi 'vasantaweDe swapna'..khaas.

'Mardhekar the Dada'..thanks for reminding. And yes, mumbai does indeed make his poems resonate in tune in one's mind. (agadee kaalach malaa 'nhaalelyaa jaNu garbhawateechyaa..' aaThawoon mumbai-darshan ghyaayachee aniwaar ichchhaa hot hotee!)

Nandan said...

wa! shevatachya chaar olee vishesh aavadalya.

कोहम said...

mitra masta.....amachya mumbaiachi kadakadun athavan zali...

hemant_surat said...

प्रिय प्रसाद,
खूप दिवसांनी प्रसाद भेटला हवा होता तसा. कदाचित मीच तुझ्या साईटवर ऊशिरा आलो असणार. पण तुझी मुंबईवरची पहिल्याच वाक्याची कॉमेंट clean bold करून गेली. तुझा मोबाईल नं . e-mail वरून दे. तू पाठविलेली "भय ईथले संपत नाही "ही माझी ringtone होती कित्येक दिवस. अनिलांची CD मी पाठवीन तुला लवकरच. order दिली आहे.
हेमंत_सूरत

Saee said...

Khup goad.
Even as we fight the rules off poetry today, when it sings like a train going on a bridge, you end up liking it more even with the rebel in you. :)
Awesome. I may add the link to this blog on mine.
Cheers
Saee