Thursday, April 17, 2008

कल्पवृक्ष कन्येसाठी .........

सुमन रोजच्याप्रमाणे स्वयंपाकघरात रमली होती. तो तिचा एक छंद होता आणि विरंगुळाही. साडे बारा वाजले. दारावरून दप्तरांचा एक थवा चिवचिवत नुकताच पुढे सरकला.
"पोरी तुझ्या हाताला चव आहे गं !" आई तिला नेहमी म्हणायची. "मग मीठाबरोबर थोडं गाणंही घालायला लागतय की भाजीत" तिला एकदम भिमाक्का आठवली.

"जीवलगा ऽऽ आऽऽ
राहीले रे दूर घर माझे एऽऽऽ....
"


आईऽऽ गं ! तो रेडीओ दुरुस्तीला द्यायचा राहीला. ती हळहळली. किती प्रेमाने ताईंनी तो दिला होता. पंधरा दिवस होत आले तो बंद पडलाय. ती निघाली तेव्हा हळ्व्या झाल्या, "पोरी जिवनात कधी सूर गमावू नकोस. दुःखात त्यांनी तुला साथ दिली, सुखात तू त्यांना दे."

"पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे.
जीवलगा ऽऽऽ......."
पण आज हे गाणं......

सर्जेराव तालुक्याला गेलाय. आज घरात ते दोघंच. ती आणि सूरज.
"च्या मायला शंकर्या काय भुसकाट बोलींग करतोय?" सूरजचा आवाज येत होता.
काय करावं या पोराला? रोज नवीन शिव्या शिकून येतो. सर्जेरावाला सांगायला हवं.

"काय सर्ज्या, करतोस का पोरीशी लग्न?
गाण्यात रमलीय तशीच संसारात रमेल तुझ्या."
केवढ्याने दचकली ती! तो ही दचकला. ती गाण्यात दंग, तो तिला पाहण्यात. बाबांचा असा अचानक प्रश्न आला तशी ती लाजली. बाबांना कसं हळू आवाजात बोलणं माहीतच नाही. ती आनंदवनात आली तेव्हा आठ वर्षाची होती. सुरवातीला बाबांच्या आवाजाला फार घाबरायची. तिच्या बापाचा आवाज तिनं आठवायच्या प्रयत्न केला. पण कित्येक वर्षात तो काही बोललाच नव्ह्ता. त्यांची बोटं जशी वेदना विसरली तशी बहुतेक जीभही भाषा हारवून बसली. सू... सू.... करत आलेला दगड आईनं आपल्या आंगावर झेलला. मारणार्या हातावर राखी च्या धाग्याचा गुलाबी रंग अजून निलाजर्यासारखा तसाच होता. तेव्हा आईचं कपाळ फुटलं आणि तिचा बाप मुका झाला. नंतर ते तिघेही इथे आले.

गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तीमिरी बुडला

तिनं तव्यावरच्या भाकरीवर पाण्याचा हात फिरवला. भाकरीवर उमटलेले तिच्या बोटांचे ठसे दिसेनासे झाले. दोन चार धांदरट थेंब तिच्या मनगटावरून तव्यावर उतरले. चर्रर् करत विरून गेले. तिचं मन हूरहूरलं. समोरच्या बोरीच्या सावलीशी रोज दंगा घालणार्या चिमण्या आज अजून का बरं नाही आल्या? तिला उगाचच उदास वाटून गेलं. दुसर्या भाकरीसाठी तिनं पिठ एकसारखं केलं. थप थप थप थप,
थप थप थप थप, थप थप थप थप ती त्या लयीत बुडून गेली. चूलीच्या ऊबदार श्वासाने लालबुंद झालेल्या तिच्या नाकाच्या शेंड्यावर घामाचा एक थेंब थरथरत येऊन स्थिरावला. उजव्या गालावर आलेली चुकार बट त्याच एकठाय लयीत - थप थप थप थप, थप थप थप थप. तिनं तवा उचलून भाकरी निखार्यावर ठेवली. छान खरपूस वास घमघमला. तिचा चेहरा उजळला त्या आठवणीच्या वासानं.
भिमाक्का भाकरी भाजायची त्यावेळी ती चुलीशी बसून मन भरेस्तोवर वास घ्यायची. त्यातच तिचं पोट भरायचं. भिमाक्का लाडानं पाठीत दणका घालत म्हणायची, "जा पळ बाहेर. उगा सकाळधरन मांजरीसारखं ऊबेला बसलीय!"

राहीले रे दूर घर माझे एऽऽऽ....

भाकरी छान टम्म फुलली. सूरज डोळे मोठ्ठे करून तिच्याकडे बघत होता.
"आय, मला बी शिकव की"
"काय? भाकरी करायला!"
"नाही त्यात हवा कशी भरतेस ते"
तिला हासू आवरेना झालं. "मी आण्णांना तुझं नाव सांगणारे"
तो चिडून बाहेर पळाला. सर्जेराव येईतो सूरज हे विसरूनही जाईल. तिनं चूलीवरनं भाकरी उतरवली. थप थप थप थप, थप थप थप थप.... त्या नादात ती परत भूतकाळात शिरली.

भिमाक्का आणि गोदुमावशी भाकरीला बसायच्या. कितीतरी भाकर्या करव्या लागत रोज. जेवणारी तोंडच तेवढी होती. तिला आठवत होतं तसं आनंदवनात कायमच येवढी लोकं. ती ऐकून होती की बाबा आजारी पडल्य़ापासनं पै पाहुण्यांचा राबता फारच वाढलाय. ताई अगदी शीणून जात असणार. जाईच्या वेली सारखी नाजूक ताई पण कामाला भिडल्य़ा की भल्या भल्यांना लाजवतील. बाबांचा कामाचा दबदबा मोठा. पाच पंचवीस लोकांना हाताशी धरणार, स्वतःही त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून कामावर तुटून पडणार. त्यांच्या सहवासात आलेला माणूस झपाटला नाही तरच नवल. ताई त्यांची सावली जणू. एखादा मायाळू झरा. दोघांनाही आनंदवनातील जीवन फुलवण्याचा एकसंध ध्यास. तव्यावरची भाकरी भाजायला म्हणून तिनं उलथण्यावर घेतली तशी तीची सय मोडली आणि केविलवाणी होतशी तव्यावर पसरली. ती अस्वस्थ झाली. भींतीवरची पाल सहानभूतीने दोनदा चुकचुकली.

गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमीरी बुडला
मिटले दरवाजे.............

धडाम् !!
बाहेर काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला. तिचं काळीज धपापलं. सूरजच्या विचारानं ती धडपडत उठली आणि कशीबशी दाराशी आली. सर्जेरावाची थोराड फटफटी आडवी तिडवी पडली होती. तिचं धूड आऽ वासून तिच्याकडे खुनशी नजरेनं बघत होतं. तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. सूरज त्या गाडीखाली...
तितक्यात शेजारी उभा असलेला गजानन तिला दिसला अन त्यानं बखोटीला धरलेला सूरज - एक पाय हवेत एक पाय खाली, भेदरलेला. ती काय ते समजली. सूरज धावत येउन तिला बिलगला.
"अगदी वेळेवर आलास भाऊ !"
गजानन इथेच पोस्ट्मन म्हणून काम करणारा- आनंदवनात वाढलेला- माहेरचा माणूस. तो काहीच बोलेना.
"भाकरी खाणार?"
पण तो जागचा हाललादेखिल नाही.

"बाबा गेले.... सकाळी" तो वळला आणि निघून गेला.

"जीवलगा ऽऽ ........
तिचं गाणं संपलं तेव्हा डोळ्याच्या कडा पुसत बाबा म्हणाले होते " तुझ्या गळ्यात जादू आहे बेटा. सुखी रहा."
या आशिर्वादाला पुरता महीना देखिल झाला नाही. ते शब्द अजूनही तिच्या कानात आहेत.

"पोरी तुझ्या हाताला चव आहे गं !" आई तिला नेहमी म्हणायची.
तिच्या बापाची काळजी करत करत आई झिजून मेली. तिचा मुका बाप तब्बल बारा वर्षांनी पहिलं वाक्य बोलला, " आता मी तरी कशाला जगू?" आणि परत मुका मुका झाला. त्यानी त्याचं खरं केलं आणि महिन्याभरातच तो महारोगाला सोडून चालला गेला. ती एकटी मागे राहीली सार्या आनंदवनाची झाली.
आज मात्र ती पोरकी .....


घरभर शांतता पसरली. तिच्या ओझ्यानं सुमनला गुदमरायला झालं. गजानन वळणावर दिसेनासा झाला तशी ती वळली. ती पाय ओढत चूलीशी आली. पोरगं म्हणालं "आई, भाकरी जळली की गं"
तिच्या पायातलं सारं अवसानच गेलं. ती मटकन खाली बसली. जळ्क्या भाकरीचा वास खोलीभर पसरला. आणि बांध फुटल्याप्रमाणे ती मुसमुसून रडायला लागली. सूरज कावराबावरा होऊन तिच्या पोटाला लगडला. तिची आसवं ओघळून त्याच्या कुरळ्या केसांत विरघळत होती.
बोरीच्या सावलीशी चिमण्या दंगा घालत होत्या.
..
..
..
"आई बाबा मेला का गं?"

"नाही बेटा, बाबा मरेल कसा? तो तर आभाळभर झालाय"





**********
मी नुकताच आनंदवनात जाऊन आलो आणि तीनच महिन्य़ात बाबा आमटे गेले. आमचं नशीब थोर. बाबांचं दर्शन झालं. साधनाताई भेटल्या. इतर आमटे कुटुंबीय भेटले. बाबा प्रक्रुती अस्वास्थ्यामुळे ’भेटू’ शकले नाहीत. माझ्या बरोबरचे एक जण म्हणाले "काय करणार? नुसतं त्यांना बघण्यात समाधान मानावं लागणार." पण ते खरे नाही. बाबा ही आता व्यक्ती उरलेली नाही. तिथे प्रत्येक माणसाला भेटताना बाबा भेटत होते. आनंदवनात सगळीकडे बाबाच तर होते!
प्रवास वर्णन आणि आपलं फारसं जमत नाही. ठिकाणं, तारखा लोकांची नावं आपल्या काही लक्षात रहात नाही. पण माणसांचे चेहरे आणि त्या मागच्या कहाण्या हे मात्र कुठे तरी कोरून ठेवल्यासारख्या आठवणीत राहतात.

मी जाऊन आल्यावर चारू, गायत्री, केदार सगळे म्हणाले अनुभव कळव. केदारने तर टाईप देखिल करायची तयारी दाखवली.
बरेच दिवस झाले ते राहूनच गेले. आजूनही कच्चा मजकुरच देत आहे त्या वर काम करायला कधी वेळ मिळेल कोणास ठाऊक?

ही कथा काल्पनिक आहे. पूर्णतः माझ्या अनुभवावर आधारीत. तरी इतिहास संशोधकांनी आपापली भिंगे बाजूला ठेवावीत.

12 comments:

Priya said...

"एक मित्र आनंदवनात जाऊन आल्याचं" मागे गायत्री बोलली होती, तो तूच असावास. भाग्यवंत आहेस! प्रवासवर्णनापेक्षा त्या प्रवासाने, तिथल्या वास्तव्याने आपण कसे अनुभवश्रीमंत, जाणीवश्रीमंत झालो, ते वाचायला अधिक भावतं. आनंदवनातील लोकांच्या मनात, त्यांच्या 'कहाणी'त डोकावण्याचा तू प्रयत्न केलास किंवा तसंच करायला प्रवृत्त झालास, यातच सगळं आलं! :) गोष्टीबद्दल सांगायचं तर शेवट आवडला. आनंदवन आणि बाबांबद्दल असल्याने 'साहित्तिक' ;-) दृष्टीकोनातून अधिक विश्लेषण करायला नको वाटतंय. लिहीत रहा. वाचायला आवडेल :-)

अमोल केळकर said...

खुप छान . लेख आवडला

Anonymous said...

khupach mast aahe katha. ekdam samor baba ubha rahila.

Anonymous said...

khoop sundar.. liheet raha..

केदार जठार said...

I have been waiting for this for so long... chaan vaTalay vachun... bakichyaa goSHTi puN post kar lavkar..

सलिल said...

फारच अप्रतिम..
पुढच्या गोष्टी टाक आता लवकर.
लाल रंगात येणारे गाणे मस्त पुढे नेते गोष्टीला..मनापासून आवडले.

फक्त गोष्टीत मला दिलेले खोटे credit काढ बरे.

Rahul Joglekar said...

great..chhan aahe katha...

prasad bokil said...

धन्यवाद. पण कुठे तरी काही तरी बिनसतय. तुकडे तुकडे बरोबर आहेत बहुदा पण एकत्र मनासारखे आले नाहीत अजून. कदाचित मधल्या काही रिकाम्या वाटणार्या जागा भरायला हव्यात.

Hemangj said...

Khup chan vatala vachun, mi pan ajunahi asvastha hote anandvan chya athavani aalya var. Asa kahi tari lihita yet nahi pan ........ vichar matra jat nahit. Ani sadhya tari kahi karu shakat nahi

मंदार said...

aaj asach udas hoto mazya chotya chotya problems madhye... achanak vatala ki kahi karanya peksha deshat parat jaun kahi tari kam karava ... tevadha dheer ajun zala nahi kinva samjat nahi nakki kay te... ani parat aplya koshat ani lahan lahan taN taNavanmadhye gurfatun gelo... ya kathena ani fakt ek parichhed anand vanachya anubhavana sagalyala dhakka dila.. tuza blog vachala ki asa fresh paus padun gelya var chaha ghyava asa vatata kinva grace chi kavita kahi aplyala jevadhi samjel tevdhya pratima manat umtun kahi vegalya anahat bhavana jagavavi yatala kahi ek vatata...
lihit raha... mazya sarkhya hajar jaNanna jaganyasathi kahi na kahi asha ani ekhadi changali baju disat rahate... rojacha rahat gadaga ani anubhavala janara kadvat pana ani rajkaran yapalikade kahi uttam jaNiva ahet he lakshat yeta... pls lihit raha...

Unknown said...

keval apratim
surekh!!!!!!
tuzya bakichya goshti pan upload kar.vachayala khoop aawadel.

Dhananjay said...

lekh awadala. chaan!